जामनेर प्रतिनिधी
आई-वडील बाहेरगावी वर्षश्राद्धाला गेले असताना घरापासून जवळच असलेल्या केटीवेअर बंधाऱ्या पर्यंत खेळत गेलेल्या चिमुकल्या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जामनेर तालुक्यातील जांभूळ येथे आज रविवारी ( ता .१९ ) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की , जामनेर तालुक्यातील जांभूळ गावापासून जवळच थोड्या अंतरावर नितीन एकनाथ जोशी आणि गोरख एकनाथ जोशी हे दोघे सख्खे भाऊ राहतात . गंगापुरी ( ता . जामनेर ) येथील मूळचे रहिवासी असलेले हे भाऊ मजुरी तसेच भिक्षुकी करून आपला चरितार्थ चालवितात . आज रविवारी शेंगोळा (ता .जामनेर ) येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी नितीन जोशी हे त्यांच्या पत्नीसह गेले असताना त्यांची ७ वर्षांची मुलगी मानवी नितीन जोशी आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र गोरख जोशी हे दोघे चुलत बहीण भाऊ खेळत खेळत दुपारच्या सुमारास घरापासून जवळच अंतरावर सुभाष रामदास शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत गेले . खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून
मृत्यू झाला . दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी त्यावेळी कुणीही उपस्थित नव्हते . सहज म्हणून मयत रुद्रचे मामा मुकुंदा हरी जोशी केटीवेअर बांधापाशी आल्यावर त्यांना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले . त्यांनी लगेचच मुलांच्या आई-वडिलांशी संपर्क केला . चिमुकल्या मानवी आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला . घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे , हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्दैवी चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले .पोलीस पाटील सुनील साबळे यांनी पंचनामा केला .
आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघा बहिण भावावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जांभूळ गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले .
दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ रुद्र गेला चिमुकला ६ वर्षीय रुद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता ,तो जांभूळ येथील अंगणवाडीत शिकत होता ,तर मयत मानवी जांभोळ येथील जिल्हा परिषद शाळेत इ . २ रीत शिकत होती . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या गृह भेटीतून दोघे बहिण-भाऊ अभ्यास करत होते . गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे , भानुदास तायडे , मुख्याध्यापक नाना धनगर, शिक्षक राजेंद्र भोई ,दीपक सुरडकर ,भास्कर इंगळे वर्गशिक्षक संजय पाटील यांनी निधनाबद्दल दुःख व्यक्त केले . मानवीच्या पश्च्यात तीन बहिणी आई-वडील असा परिवार आहे . या चिमुकल्या निरागस चुलत बहीण भावांच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे .
