अकोट ग्रामीण प्रतिनिधी संजय गवळी
केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधी कायदे पारित केल्यामुळे या कायद्याविरोधात हरियाणा व पंजाब येथील लाखो शेतकरी आंदोलन करत दिल्ली पोहोचले. याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले. या शेतकरी आंदोलनामध्ये सर्वच शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, या पक्षांनी व इतर सामाजिक संघटना यांनी सुद्धा या आंदोलनास पाठिंबा देवून प्रत्यक्ष बंद मध्ये सहभागी होऊन आजचा बंद यशस्वी केला.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सर्व स्तरातून मागणी होत असल्यामुळे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत आज अकोट शहर व तालुक्यात बंद पाळून हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. भारतातील ७०% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे भारत हा देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहेत त्यामुळे भारतातील सर्व शेतकरी एकवटला आहे.
यापूर्वी कधीही शेतकरी एवढ्या बहुसंख्येने एकत्र येऊन लढले नाही. याचाच प्रत्यय आज भारत बंदला मिळालेल्या प्रतिसादातून दिसून येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा व शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी आजचे आंदोलन असून याचा निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.

