देवानंद नेमाने प्रतिनिधी
खरीप हंगाम जवळ आलेल्या असतांना केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली असून यामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडणार असून केेंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी कराव्यात अन्यथा शिवसेना व युवासेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, खरीप हंगाम जवळ आलेला असतांना रासायनिक खतांच्या किंमतीत काही ग्रेडमध्ये गोणीमागे सहाशे ते सातशे रुपयाची दरवाढ केली केल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कारोनाच्या काळात आधिक शेतकर्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस आलेला आहे. त्यात खताच्या किंमती मोठी वाढ झाल्याने केंद्र सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तसेच डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली असतांना शेतकर्यांचे मशागतीच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करतांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी दिलासादायक पावले उचलणे गरजेचे असतांना खतांच्या किंमतीत दरवाढ करुन शेतकर्यांच्या कंबरडे मोडू पाहत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
केंद्र सरकार एकीकडे पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करीत आहे. तर दुसरीकडे खतांच्या किंमतीत वाढ करुन तीच रक्कम शेतकर्यांकडून परत घेत आहे. त्यामुळे या पीएम किसान योजनेचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खतांची ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थित होणार आहे. तरी केेंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी कराव्यात अन्यथा शिवसेना व युवासेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर शिवसेना नेते माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरुभाऊ खेडेकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुका प्रमुख कपिल खेडेकर ,मा. तालुका प्रमुख अर्जुनदादा नेमाडे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख नंदु कर्हाडे, शहर संघटक प्रितम गैची, बाजार समितीचे संचालक गजानन पवार, नगरसेवक दत्ता सुसर, युवासेना शहर प्रमुख विलास घोलप, उपशहर प्रमुख मनोज वाघमारे, समाधान जाधव, माजी नगरसेवक शाम शिंगणे, आनंद गैची, रवि पेटकर, बंटी कपूर, शुभम् खरपास, विशाल इंगळे, हरी इंगळे, पप्पु परिहार, पिंटू गायकवाड, साजीदभाई, शेख बबलू, शंभु गाडेकर, गणेश कुडके, अरुण जाधव उपस्थित होते.
