गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा-शासकीय अधिकारींचेही दुर्लक्ष तर ठेकेदाराचा आडमुठेपणा-आमदारांनी केली सा.बां., ठेकेदाराची कानउघाडली-संताप झाला अनावर...
एरंडोल - येथील शहरी हद्दीतून जाणार्या एरंडोल-म्हसावद रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असल्यामुळे परिसरातील नागरीक वैतागले आहेत. 15 दिवस काम करून सहा-सहा महिने काम बंद ठेवल्यामुळे वाहनधारकांसह महिला, नागरीकांना दोन वर्षांपासून मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यावर ग्रामीण रूग्णालय असल्याने अपघातप्रसंगी आणि कोरोनाकाळात रूग्णांना, मृत व्यक्तींना आणतांना-नेतांना वाहनाची कसरत होते तर जीव मुठीत धरून नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो.
याबाबतीत वृत्तपत्रांमधून अनेकवेळा आवाज उठविला, रास्ता रोको देखील केला परंतू निर्लज्ज आणि बेशरमपणा, बेजबाबदारपणाचा कळस गाठलेल्या अधिकारी, ठेकेदारांनी दुर्लक्षच केले. खेदाची बाब म्हणजे रस्ते अपघात टाळावेत म्हणून शासनाने मोठा निधी मंजूर केला परंतू अधिकार्यांच्या बेफिकीरवृत्तीने आणि ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे काम रेंगाळले आहे. काँक्रीटीकरणासाठी केवळ 2/4 इले. पोल असल्यामुळे अडचणीचे कारण सांगून वीजमंडळ, ठेकेदार, सा. बां.च्या अधिकार्यांमुळे रस्ता काम रखडले आहे. सदरबाबतीत 26 जानेवारी 2021 रोजी आमदार चिमणराव आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज मंडळासह इतर अधिकार्यांच्या बैठकीत संबंधितांना कडक सुचना दिल्या. असून देखील पाच महिने काम बंद ठेवले. यास म्हणावे तरी काय ? मागील आठवड्यात 18 जून रोजी म्हसावद नाक्याजवळ परिसरातील संतप्त नागरीकांनी, महिलांनी अचानक रास्ता रोको केल्यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळी स.पो.नि. तुषार देवरे आणि सहकारींनी ठेकेदाराशी बोलणे केले असता सोमवारी 21 जूनपासून काम सुरू करण्याचे आश्वासन देवून आणि आ. चिमणराव आबांनी देखील खडसावले असता रास्ता रोको थांबविण्यात आला. परंतू आज दि. 25 जून रोजी माल वाहतूक ट्रक इले. तारांचा स्पर्श झाल्याने थांबला. जीवीत, वित्तहानी टळली एवढेच. आ. चिमणराव आबांना पुन्हा एरंडोलला बोलावून रस्त्याचे काम दाखविण्यात आले. नागरीकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सा. बां. अधिकारी, वीजमंडळ, ठेकेदारा यांना पाचारण करून जाब विचाराला.
जळगांव सा. बां. विभाग, कार्यक़ारी अभियंता राजपूत यांना आमदारांनी चांगलेच खडसावले. येत्या अधिवेशनात तारांकीत प्रश्न-तातडीचा प्रश्न म्हणून उपस्थित करून जाब विचारणार असल्याचे सांगून अधिक्षक़ अभियंता, संबंधित मंत्र्यांना संपूर्ण तक्रारी सांगणार असल्याचे सांगून आतातरी झोपेचे सोंग सोडा, जनतेच्या हिताची कामे करा अन्यथा घरी बसा अशा शब्दांत खडसावले. त्यामुळे ठेकेदाराने सोमवारपासून काम सलग करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलनाची सांगता झाली. सदरप्रसंगी शिवसेनेचे माजी तालूकाप्रमुख किशोरभाऊ निंबाळकर, शालिग्रामभाऊ गायकवाड, चंदनसिंग जोहरी, नगरसेवक कुणाल महाजन, चिंतामण पाटील, अतुल महाजन आदी उपस्थित होते.

