हिवरखेड प्रतिनिधी:-जितेश कारिया
हिवरखेड गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव
हिवरखेड नगरपंचायतसाठी हिवरखेड वासियांचा मागील 22 वर्षाचा संघर्ष शासन दरबारी फळास येत असल्याचे पाहून व आमरण उपोषणाची दखल घेऊन हजारो हिवरखेड वासीयांनी साखळी उपोषण केले आणि सह्या देऊन आपले लेखी समर्थन दर्शविले. सोबतच आमदार अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवरखेड नगरपंचायत करणारच असे सांगताच हिवरखेड नगरपंचायत रोखण्यासाठी काही जण सक्रिय झाले असून हिवरखेड नगरपंचायत करण्यात येऊ नये आणि हिवरखेड गावाचे दोन तुकडे करून गावात दोन ग्रामपंचायती करण्यात याव्या असा ठराव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ग्रामसभेत लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या.
तसेच ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, यांनी ग्रामसभेचे कामकाजाचे रजिस्टर घेऊन ग्रामसभेतून काढता पाय घेतला. ज्या व्यक्तीस आपण सही मारलेल्या अर्जात संबंधितांनी काय लिहून घेतलेले आहे हे सुद्धा माहीत नाही असे बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात आल्याने त्या अर्जदारास समोर करून गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव जनतेसमोर उघडा पडल्याची गावभर चर्चा आहे.
या ग्रामसभेच्या माध्यमातून हिवरखेड नगरपंचायत होऊ न देणे तसेच हिवरखेड गावाचे दोन तुकडे करून दोन ग्रामपंचायती कराव्या असा अर्ज देणाऱ्या अर्जदाराची पाठराखण करून हिवरखेड नगर पंचायत निर्मितीची स्थानिक स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना तसेच नगरपंचायत करण्यासाठी ग्रामसभेचे आणि मासिक सभेचे ठराव सुद्धा गेलेले असल्याची माहिती अर्जदाराला देण्याऐवजी गावाचे दोन तुकडे करून दोन ग्रामपंचायतची करण्याचा ठराव घेण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांचे पितळ जनतेसमोर उघडे पडल्याची चर्चा गावभर होत आहे .
प्रतिक्रिया
हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये गुंडाराज असल्याची प्रचिती येत असून जागरूक नागरिकांवर सत्ताधाऱ्यांकडून दबावतंत्र वापरून लोकशाहीला काळिमा फासल्या जात आहे. याची मा.जिल्हाधिकार्यांनी तात्काळ दखल घ्यावी. अशी आमची मागणी आहे. सुनील इंगळे ग्रामपंचायत सदस्य हिवरखेड.
दिनांक 21 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत कोरम पूर्ण न झाल्याने सदर ग्रामसभा तहकूब करण्यात आली आहे. गजानन मेतकर, ग्रामविकास अधिकारी हिवरखेड.
21 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेतील झालेला प्रकार अत्यंत निंदनीय असून लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. जर ग्रा प सत्ताधारी व ज्या लोकप्रतिनिधींना खरोखरच या गावात नगरपंचायत नको असेल तर त्यांनी जाहीररित्या विरोध करावा. पण दोन ग्रामपंचायती करून आम्ही गावाचे दोन तुकडे करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संदीप इंगळे, माजी सरपंच, हिवरखेड
