हिवरखेड-जितेश कारिया
पाटबंधारे विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने चोरट्यांची दिवाळी पर्यटन विकासाकरिता होऊ शकतो ह्या मालमत्तांचा बहुमूल्य उपयोग*
वारी हनुमान हे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र आहे. तसेच निसर्गाने येथे अद्भुत सौंदर्याची देणगी दिलेली असल्याने पर्यटनाकरिता सर्वात पसंतीचे स्थळ म्हणून वारीची ओळख आहे. अकोला बुलढाणा अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथे समर्थ रामदास स्वामीं द्वारे प्राणप्रतिष्ठा केलेली हनुमंताची विशाल मूर्ती आहे. 12 महिने शुद्ध पाणी देणारे पवित्र गौमुख आहे. बाजूलाच हनुमान सागर हे वान नदीवरील धरण आहे. सातपुडा पर्वताच्या हिरव्याकच्च पर्वतरांगाच्या पायथ्याशी निसर्गरम्य सानिध्यात समोरून पारदर्शक शुद्ध पाण्याने खळखळणारी वान नदी आहे. अशा नयन रम्य ठिकाणी पर्यटनाच्या विकासासाठी बराच वाव आहे.
एकीकडे शासन पर्यटनाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करीत असताना वारी येथे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या इंस्पेक्शन बंगला(विश्रामगृह) व संबंधित इमारतींची देखरेखी अभावी व उपयोगा अभावी पूर्णतः दुर्गति होत असल्याचे भीषण वास्तव समोर दिसत आहे. येथे पाटबंधारे विभागाचे चार कमरे, दोन महाराजा सूट, स्टॉल, डायनिंग रूम, दोन खोल्यांचे स्वयंपाक घर, स्टोअर रूम, कर्मचारी क्वार्टर्स, वाहनतळाच्या खोल्या, समोर मोठी खुली जागा, एवढेच नव्हे तर बाजूला हजारो स्क्वेअर फुट चा भव्यदिव्य कम्युनिटी हॉल मनोरंजन केंद्र, मैदान उपरोक्त मालमत्तांचा विचार करून ह्या मालमत्ता वन विभाग अथवा एमटीडीसी पर्यटन विभागाला हस्तांतरित केल्यास पर्यटकांकरिता निवास व्यवस्था होऊ शकते, भव्यदिव्य हॉल विविध कार्यक्रमांत करिता सांस्कृतिक धार्मिक आयोजना करिता उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या महसुलात वाढ होण्यास व पर्यटनाला चालना मिळण्यास मैलाचा दगड ठरणारी बाब होणार आहे. काही वर्षांपूर्वी अत्यंत चांगल्या अवस्थेत असलेल्या या इमारतींचे चोरट्यांनी व माकडांनी उच्छाद मांडून पुरती वाट लावली आहे. येथील सर्व दरवाजे फर्निचर किमती साहित्यावर तसेच, इमारतीचे लोखंड, भिंतीच्या भिंती फोडून विटा चोरीला जात आहेत,
| वारी येथील कोट्यवधींच्या मालमत्ताची चोरी व दुर्गती झाल्याचे भीषण वास्तव |
चोरट्यांनी हात साफ केले असून आतापर्यंत चोरीचा आणि दुर्गातीचा हीसोब केल्यास शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यावरही पाटबंधारे विभागाचे झोपेचे सोंग घेऊन अजून पर्यंत चोरीची एकही तक्रार पोलिसात दिली नसल्याचा सरळ सरळ आरोप जागरूक नागरिक हरीश झापर्डे यांनी केला आहे. यामध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लवकरच पाटबंधारे विभागाने व शासनाने ठोस पावले न उचलल्यास उर्वरित मालमत्तेच्या जागी खुले मैदान होण्यास वेळ लागणार नाही. वारी हनुमान येथील पर्यटनाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे साकडे घालून वारी येथे विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी आणि वाहन पार्किंग ते मंदिर, मंदिर ते हनुमान सागर प्रकल्प, हनुमान सागर ते वाहन पार्किंग पर्यंत केबल कार, रोप-वे, ट्रॉली सुविधा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावर प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे महाराष्ट्र शासनाला निर्देश दिल्यावरही नियोजन समितीने पंचवार्षिक विकास आराखड्यात सदर कामाचा समावेश केलेला नव्हता हे माहिती अधिकारात स्पष्ट झाले. त्यामुळे प्रधानमंत्री कार्यालयाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याबद्दल व पर्यटनाच्या विकासाबाबत शासन फारसे उत्सुक नसल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांमध्ये निराशा दिसून येत आहे.
प्रतिक्रिया,
सामान्य जनतेकडून वसूल केलेल्या टॅक्समधून बांधलेल्या कोट्यावधींच्या मालमत्तांची चोरी व दुर्गती होत असताना पाटबंधारे विभागाने पोलीसात चोरीची साधी तक्रार सुद्धा न केल्याचे आश्चर्य असून शासनाने त्वरित निर्णय घेऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी या मालमत्तांचे नूतनीकरण करून पर्यटकांसाठी वापर करावा.-- हरीश झापर्डे, सामाजिक कार्यकर्ते.
आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याने विविध अडचणी येत आहेत. सदर मालमत्ता पर्यटन विकासासाठी हस्तांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. सदर मालमत्ता पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा विचार सुरू आहे.-- नयन लोणारे, अभियंता, पाटबंधारे विभाग.