बाळापूरला पाणी पळविणे हा तेल्हारा, संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
जितेश करीया हिवरखेड :-
हिवरखेड नजीकच्या वारी हनुमान येथील वान प्रकल्पाची निर्मिती ही सिंचनाच्या उद्देशाने केले गेलेली आहे. त्यामधील फक्त 15 टक्के पिण्यासाठी आणि 10 टक्के औद्योगिकरण साठी एवढेच आरक्षण शासनाच्या तत्कालीन जीआर मधून निर्गमित केलेले आहे. परंतु सद्यस्थितीतील आरक्षण त्यापेक्षा खूप जास्त झालेले आहे. एवढेच नव्हे तर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून बाळापुर तालुक्यातील 69 खेडी योजनेच्या पिण्याच्या पाण्यासाठी 4.58 द.ल.घ.मी. पाणी आरक्षण करून पाईपलाईन टाकणे सुद्धा चालू झालेले आहे. तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला कडाडून विरोध केलेला आहे. या योजनेच्या विरोधात नागपूर हायकोर्टात केस सुद्धा मे 2022 मध्ये दाखल झालेली असून संबंधित विभागांना कोर्टामार्फत नोटीस सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत. तरी सुद्धा बाळापुर तालुक्यातील 69 खेडी योजनेचे काम मोठ्या जोमाने चालू असल्याने संबंधित आमदारांचा हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलेला आहे.
आता वान धरणात एकूण जलसाठ्यापैकी सिंचनाकरिता अत्यंत अल्प पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे अल्प पाण्यात शेती सिंचन कशी होईल या विचाराने बळीराजा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचीकेला न जुमानता पाईपलाईनचे नियमबाह्य काम सुरू आहे. हे काम तात्काळ बंद करावे यासाठी शेतकऱ्यांनी व वान पाणी बचाव संघर्ष समितीने तेल्हारा तहसीलदारांना निवेदन दिले आहे. बाळापूर 69 खेडी योजनतील गावांना पाणी पुरेल एवढी धरणे जलस्त्रोत त्याच परिसरात असतानाही 80 किलोमीटर लांब असलेल्या वान धरणावरून पाणी पळविण्याचा घाट कशासाठी घातल्या जात आहे? असा सवाल सुद्धा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली असूनही त्यांना न्याय न मिळाल्याने शेतकरी बांधवांनी आता टोकाची भूमिका घेण्याचा निर्धार केला असून पाच दिवसाच्या आत योग्य दखल न घेतल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदनावर सौंदळा सोनवाडी सोसायटी सोसायटी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शाम वानखडे, सचिव अशोक वानखडे, उपाध्यक्ष संतोष वानखडे, दीपक अहेरकर यांच्यासह तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आणि वाण पाणी बचाव संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
