![]() |
"अत्यंत साधेपणाने विवाह लावून समाजापुढे नवीन आदर्श कायम केले"
असलम परवेज
देऊळगाव माही: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माही येथील एका मुलाच्या साखरपुडा समारंभाचे लग्नसोहळ्यात रूपांतर झाल्याची सुखद बाब समोर आली आहे. सध्या समाजासमोर एक मोठी समस्या म्हणजे लग्नातील अनावश्यक विधी आणि अनावश्यक खर्च झाले आहे. त्यामुळे लग्न हे अत्यंत अवघड काम झाले आहे तर दुसरीकडे काही विचारवंतांच्या प्रयत्नांमुळे जनजागृती करून साधे विवाह करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशाच प्रकारचे एक साधे विवाह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माही शहरातील झाले आहे.
शेख जुबेर अब्दुल कदीर या मुलाचे नातेसंबंध औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील शेख युनूस यांच्या मुलीशी जुळले होते व काल त्यांचा साखरपुडा समारंभ कन्नडमध्ये पार पडला. दोन्ही कुटुंबातील नातेवाईक या कार्यक्रमासाठी जमले. यावेळी त्यांचे एक नातेवाईक सय्यद युनूस यांनी हा समारंभ विवाह सोहळ्यात बदलला जावा, असे प्रस्ताव समोर ठेवले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांची समजूत काढण्यात सय्यद युनूस यांना यश आले आणि अशा प्रकारे शेख जुबेरचा निलोफर शेख युनूस सोबत विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. दुसऱ्या दिवशी देऊळगाव माही येथे साध्या पद्धतीने वलीमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये नातेवाईक, मित्रपरिवार व शहरातील मान्यवरांनी सहभाग घेऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन केले. लग्नाला साधेपणाने पसंती देऊन इतर तरुणांसमोर एक चांगला आदर्श ठेवल्याबद्दल नौशाचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
