असलम परवेज
बुलढाणा- जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत समानीकरण झालेला असल्याने आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यातील बॅन पदांसह सर्व रिक्त पदांवर सेवाजेष्ठतेने पदस्थापना देणे बाबत अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने अमरावती पदवीधर आमदार धीरज लिंगाडे व जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या मार्फत प्रधानसचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविले आहे.
सविस्तर असे की सन 2017 ते 2022 दरम्यान आंतरजिल्हा बदली झालेल्या मात्र 10% पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने त्यावेळी कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना 30 एप्रिल 2023 पूर्वी कार्यमुक्त करून नवीन जिल्ह्यात रुजू होण्याचे शासनाने आदेश दिलेले होते. यानुसार आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक आपापल्या जिल्ह्यात रुजू होत आहेत. आंतरजिल्हा बदलीने नवीन जिल्ह्यात रुजू होणाऱ्या ह्या शिक्षकांनी अनेक वर्षांपासून परजिल्ह्यात आपल्या मूळ गावापासून दूर सेवा केलेली असल्याने स्वजिल्हयात आल्यावर या शिक्षकांविषयी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत समानीकरण झालेला असल्याने अशा शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात, अवघड क्षेत्रात किंवा रिक्त जागांची टक्केवारी सर्वात जास्त आहे अशा तालुक्यात सक्तीने पदस्थापना देण्याची गरजही नाही. तरी आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यातील बॅन पदांसह सर्व रिक्त पदे दाखवून सेवाजेष्ठतेने पदस्थापना द्यावी व याविषयी सर्व जिल्हा परिषदांना आदेश निर्गमित करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळात राज्यसचिव शेख जमीर रजा, विभागीय अध्यक्ष ऍड. मतीन तालिब, शाहिद हुसेन, शेख हनीफ, अब्दुर्रहीम सर, शेख आदिल उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्री व प्रधान सचिव आदीं सह आयुष प्रसाद, अध्यक्ष, जि.प.शिक्षक बदली अभ्यास गट, महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.

