हा हात जोडलेला माणूस कोण आहे माहिती आहे तुम्हाला ??? हे आहेत शहीद विरजवान ऋषिकेश जोंधळे यांचे वडील...ऐन दिवाळीत या बापावर हात जोडून रडण्याची वेळ आली....
महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या दिवाळी साजरी करतोय, तुम्ही आम्ही पण करतोय, पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या बहिरेवाडी गावातल्या जोंधळे कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल ?? ज्या अंगणात दिवाळीत पणत्या लागणार होत्या त्या अंगणात उद्या रविवारी किंवा सोमवारी ऋषिकेशचे पार्थिव येणार आहे...त्या पार्थिवासोबत भारतीय सैन्य दलातील अधिकारी येतील... ऋषिकेशचा युनिफॉर्म, त्याची टोपी, आई-वडिलांच्या स्वाधीन करतील आणि म्हणतील आम्ही तुम्हाला सगळे देऊ पण आम्ही तुम्हाला तुमचा मुलगा परत देऊ शकणार नाही, होय ही खरी गोष्ट आहे...इतक्या वर्षाच्या पत्रकारितेमध्ये अनेक जवानांच्या बलिदानाच्या बातम्या करण्याची नामुष्की माझ्यावर आली... अवघ्या विसाव्या वर्षी देशासाठी बलिदान.... अर्थात अंगावर गोळी झेलणं, सर्वसामान्यांचं नक्कीच काम नाही
राष्ट्रीय खेळाडू अशी ओळख झाल्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी ऋषिकेश मराठा बटालियनमध्ये भरती झाला आणि पोचला थेट जम्मू-काश्मीरच्या सीमेवर... लॉकडाउनच्या काळात हाच ऋषिकेश अनेक दिवस घरी राहिला होता... अखेर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात त्याला बोलावणं आलं आणि तो सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी तो गेला....पण कायमचा.
शिक्षणतज्ञ डॉक्टर जेपी नाईक यांच जन्मगाव असलेल आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गाव....कोल्हापूर मधून आजरा आंबोली मार्गे गोव्याला जाताना याच गावातून जावं लागतं... हेच या ऋषिकेशच गाव.... घरातला कर्ता सवरता ऋषिकेश गेल्याने आई-वडिलांवर आभाळ कोसळलय तर लहान बहीण पोरकी झालेय
राजकारण सोडा पण अजून किती जवान शहीद होणार ?? कोल्हापूर सातारा सांगली हे तर सैन्यदलाच आगार, त्याचं कारण बेळगावची मराठा लाईट इन्फंट्री....उद्या परवा ऋषिकेशच पार्थिव गावामध्ये येईल, भारत माता की जय, ऋषिकेश जोंधळे अमर रहे'च्या घोषणा दिल्या जातील पण त्यांचं कुटुंब ?? काय करावं ऋषिकेश च्या आई वडील आणि बहीनेन ?
आजही गावात मिलिटरी मधून सुट्टीवर आलेल्या जवानाची विचारपूस केली जाते पण हाच जवान आपल्यातून निघून गेल्यावर त्या जवानांप्रति संवेदना बाळगणे, त्या जवानाच कर्तव्य काय आहे हे समजून घेणे हे आपलं भारतीय नागरिक म्हणून आद्यकर्तव्य आहे..पण ऐन दिवाळी सणात जोंधळे कुटुंबीयांवर काळाने जो घाला घातला ते मनातही आणता येणार नाही म्हणून एक सांगतो, आपण घरात दिवाळी साजरी करताना आपला देशाचा सैनिक सीमेवर होळी साजरी करतोय हे मात्र विसरू नका
जात पात धर्म सोडा, भारत देशाचे नागरिक बना 🙏🏻
