लोणार तालुका प्रतिनिधी: (मो.असलम परवेज)
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच आता कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक पडणार आहे. नुकतेच याबाबत सामान्य प्रशासन विभागाने ३१ डिसेंबर २०२० म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी परिपत्रक पारित करून नवीन वर्षासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थिती व आपल्या जबाबदाऱ्या बाबत सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता उशिरा कार्यालयात पोहोचने महागात पडणार आहे.
कार्यालयीन उपस्थितीबाबतच्या दिनांक ३१ ऑक्टोबर, १९९२ च्या परिपत्रकातील परिच्छेद १६ मध्ये कर्मचारी जर एकाच महिन्यात तीन वेळा उशीरा कार्यालयात उपस्थित राहिला तर त्याची एक दिवसाची नैमित्तिक रजा वजा करण्याबाबत तरतूद आहे.
या नवीन परिपत्रकानुसार मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग कार्यालयांतील अधिकारी कर्मचारी यांना सकाळी कार्यालयात येण्यासाठी एका महिन्यात जास्तीत जास्त दोन वेळा कार्यालयीन वेळमध्ये कमाल दीड तास उशीरा येण्याची सवलत असेल, तथापि त्यानंतरच्या तिसऱ्या उशीरा उपस्थितीसाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची एक नैमित्तिक रजा वजा करण्यात येईल. संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या एकाच महिन्यातील तीन पेक्षा अधिक वेळा उशीरा उपस्थितीसाठी म्हणजे सहाव्या, नवव्या इ. प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करण्यात येईल. संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे खाती जर नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर त्यांचे मागणीनुसार एकाच महिन्यातील प्रत्येक तिसऱ्या उशीरासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे अर्जित रजा बजा करण्यात येईल. अर्जित रजा शिल्लक नसल्यास असाधारण रजा विनावेतन मंजूर करण्यात येईल. सदर सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशीरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील
उशीरासाठी असाधारण विनावेतन रजा मंजूर करण्यात येईल. परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशीरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येणार नाही.
दिनांक २४ फेब्रुवारी, २०२० च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. सबब गट-अ गट-क च्या अधिकारी कर्मचायांच्या बाबतीत कार्यालयीन उशीरा उपस्थिती ही सकाळी ९.४५ पासून दीड तास म्हणजेच सकाळी११.१५ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. तसेच शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी असल्याने त्यांचे बाबतीत उशीरा उपस्थिती ही सकाळी ११.००वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचा-यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक
घटनेमुळे जे कर्मचारी उशीरा येतील, त्यांची तशीरा उपस्थिती न मांडता ती क्षमापित करण्याची तरतुद राहणार आहे. तथापि असे करताना संबंधित विभागांनी यासंदर्भात खातरजमा करावी लागेल.
सदर निर्णय हा नवीन वर्षापासून अंमलात येईल. म्हणून आता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आता वेळेचे बंधन पाडून या नवीन वर्षामध्ये कार्यालयात उपस्थिती नोंदवावी लागेल.
