प्रतिनिधी जळगाव
पंढरपूर भाजपने भगीरथ यांना बिनविरोध निवडून देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नसले तरी भालकेच निवडून येणार असल्याचा आशावाद पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तर दिवंगत भालके नाना हे राष्ट्रवादीतील शिवसैनिक असल्याचे गौरवोदगारही काढले. आज भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ ना. पाटील यांनी घेतलेल्या सभांमध्ये उपस्थितांची मने जिंकून घेतली.
ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंढूपर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपल्या भाषणाला प्रारंभ केला. आपण आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीला मत मागण्यासाठी जाहीररित्या भाषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्याशाप देण्यात आमचे आयुष्य गेले. मात्र कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे म्हणले जात असून ते भाजपने सिध्द केले असे म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. दिवंगत आमदार भारत भालके यांच्यासोबतच्या स्नेहाला आणि त्यांच्या आठवणींना ना. गुलाबराव पाटील यांनी उजाळा दिला. भालकेनाना हे राष्ट्रवादीतील शिवसैनिक असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उधळली.
ना. पाटील पुढे म्हणाले की, आपण १९८२ साली पानटपरी चालवत होतो. यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे पाचदा आमदार तर दोनदा मंत्री झालो. यासाठी किती केसेस झाल्या ते सांगता येणार नाही. आपल्या डोक्यात मंत्रीपद गेलेले नसून आपण आजही टपरीवालाच असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपण दाढी आणि केस काढल्यामुळे कोणी ओळखत नसल्याने काल रात्री येथे फिरलो. येथील वातावरणाचा अंदाज घेतला असता ही जागा आपण ३५ ते ४० हजारांनी जिंकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, फडणविसांनी मातोश्रीवर एक गुच्छ पाठविला असता तर युतीचे सरकार बनले असते. मात्र ते अहंकारात राहिले आणि पवार साहेबांनी संधी साधून तिघांना एकत्र आणले. पंढरपूरच्या निवडणुकीत पैसा येणार असल्याची चर्चा असल्यावरही ना. पाटील यांनी खुमासदार भाष्य करत लोकांनी १६ तारखेला बाहेर खाटा टाकून दर्शनाची वाट पहावी असे म्हणताच एकच हशा पिकला. तर, अलीकडच्या निवडणुकीत माझ्या विरूध्दच्या उमेदवाराने प्रचंड पैसा खर्च करूनही आपण बहुमताने आलो असल्याचे सांगत पैशांच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या निवडणुकीत भगिरथ भालके यांना बिनविरोध निवडून देणे शक्य असतांनाही असे न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
