मुंबई प्रतिनिधी
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.
शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असेही त्या म्हणाल्या.