गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथील महापरिनिर्वाण दिवस कार्यक्रमात प्रा.डाॅ.सोनोने यांचे प्रतिपादन
प्राचीन भारत हा बौद्धमय होता. काबुल पासून कंदाहार पर्यंत तसेच इराण-इराक पर्यंत संपूर्ण भारतात बौद्ध संस्कृती विराजमान होती. या संस्कृतीने उदात्त मूल्य भारतीयांना दिलेले आहेत. या मूल्यांचे जतन करायचे असेल तर बौद्ध तत्वज्ञान अंतर्भूत असलेल्या पाली भाषेचा सर्वांनी अभ्यास केला पाहीजे. पाली भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी बौद्ध कालीन शिलालेख सापडलेले आहेत त्या सर्व हजारो शिलालेखांवर पाली भाषेच्या माध्यमातून संदेश आपणास पहावयास मिळतात. पाली भाषेच्या माध्यमातून प्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधन होणे गरजेचे आहे तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीस लाखापर्यंत शिष्यवृत्ती पाली भाषेच्या माध्यमातून प्राप्त करता येते, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय लातूर येथील पाली विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस.एम. सोनोने यांनी केले. ते पाली भाषा जाणीव- जागृती पंधरवाडा निमित्ताने एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम दादा गायकवाड होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, तात्यासाहेब ज्योतिराव फुले, सावित्री माता फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर आयुष्यमती ज्योती गजरे यांनी भीम गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आपल्या प्रास्ताविकामध्ये भरत शिरसाठ सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक स्वतंत्र विश्व विद्यापीठ असून जीवना मधील सर्वोच्च ध्येय प्राप्त करणाऱ्या व्यक्तीसाठी ते एक दीपस्तंभ आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात शालिग्राम दादा गायकवाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बहुजनांचा जीवन प्रकाशमान केले आहे, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एका समाजाचे नसून ते सर्व बहुजनांचे मुक्तिदाता आहेत, असे प्रतिपादन केले. एरंडोल शहरामध्ये अतिशय सुंदर बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी आपण भरीव प्रयत्न करू, असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमास प्रा. डॉक्टर वैशाली सोनोने, सामाजिक कार्यकर्ते व वनकोठे गावाचे माजी सरपंच मिलिंद भाऊ पवार, हिरालाल महाजन, माजी मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार मॅडम, माजी केंद्रप्रमुख लाळगे नाना, कविराज पाटील, कैलास पवार सर, धरणगाव, सुधाकर मोरे सर, धरणगाव, चिंतामण जाधव सर, प्रा. नरेंद्र तायडे, प्रा. विजय गाढे, मनोज नन्नवरे सर, प्रवीण केदार सर, गजरे सर, एस.टी.डेपो कंट्रोलर आयु. लक्ष्मण नेतकर, विनोद वानखेडे, व्ही व्ही सावळे तसेच सत्यशोधक परिषद एरंडोलचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम प्रसंगी भरत शिरसाट सर व त्यांच्या पत्नी वर्षा शिरसाठ यांचा उत्कृष्ट सामाजिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉक्टर शुभम चिंतामण जाधव, डॉक्टर भूषण चिंतामण जाधव, शरद जाधव, अनुष्का अमृतसागर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांनी तर आभार प्रकाश तामस्वरे सर यांनी मानले. एरंडोल शहरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते. महापरीनिर्वाण कार्यक्रम समितीतील सदस्या वर्षा शिरसाट, मनीषा जाधव, विषाखा नन्नवरे, प्रमिला तामसवरे, सौ. केदार, जयश्री अमृतसागर, भगवान ब्रम्हे, मुकेश ब्राह्मणे, रघुनाथ सपकाळे वायरमन, निंबा खैरनार यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.